TOD Marathi

कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. सध्याचा काळ भाजपसाठी सुवर्णकाळ आहे. हे पहाता येत्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा झेंडा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हेच कागलचे पुढील आमदार असतील. मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

महाडिक म्हणाले, ‘केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ध्यास घेतलेल्या समरजितसिंह घाटगे यांना आमदार करुनच या अभियानाची यशस्वीपणे सांगता करुया.’

हेही वाचा” …‘केसीआर’ मंत्रिमंडळासह करणार पंढरीची वारी, वारकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न?”

समरजितसिंह घाटगे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावली आहे. समाजातील सर्व थरातील नागरिकांसाठी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. विशेषतः साखर कारखानदारीला त्यांच्यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या गतिमान योजना व लोकहिताचा निर्णय तळागाळातील लोकांपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवावेत.

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा आतापर्यंत केवळ मतांसाठीच वापर केला आहे. त्यांच्या आरक्षणासाठी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार इंपिरीकल डेटा गोळा करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर येताच कोर्टाच्या आदेशानुसार इंपिरीकल डेटा गोळा करून कोर्टात सादर केला.’ असंही समरजितसिंह घाटगे म्हणाले.